Bala Nandgaonkar Letter: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा (BMC Election 2026) रणसंग्राम शिगेला पोहोचला असतानाच, मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईकरांच्या काळजाला हात घालणारे एक खुले पत्र लिहिले आहे. 'मी कालही निष्ठावंत होतो आणि आजही आहे,' असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीमागची 'इनसाईड स्टोरी' मतदारांसमोर मांडली आहे.
बाळासाहेबांची ती शेवटची इच्छा...
लिलावती रुग्णालयातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीचा संदर्भ देत नांदगावकर यांनी पत्रात म्हटले आहे की, "साहेबांनी मला सांगितले होते की, बाळा, या दोन भावांना एकत्र आण. आज साहेबांना दिलेला तो शब्द पूर्णत्वास गेला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे." राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे ही केवळ राजकीय युती नसून ती मराठी अस्मितेची गर्जना असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - What is PADU: मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच होणार 'PADU' चा वापर; मतदारांसाठी काय बदलणार?
'मशाल, इंजिन आणि तुतारी'चे नवे समीकरण
या पत्राद्वारे नांदगावकरांनी महाविकास आघाडी आणि मनसेच्या 'अभेद युती'चा प्रचार केला आहे. मुंबईतील 227 जागांवर ही युती भाजप-शिंदेसेनेला टक्कर देत आहे. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, उद्धवजी आणि राजजी हे बाळासाहेबांचे दोन डोळे आहेत, तर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक हा त्यांचा तिसरा नेत्र आहे. या समीकरणामध्ये शरद पवार यांच्या अनुभवाची जोड मिळाल्याने विकासाचे परिपूर्ण चक्र पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. जिथे रेल्वे इंजिन असेल तिथे इंजिनला, तर जिथे मशाल किंवा तुतारी असेल तिथे त्या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा - BMC Election Cash Seized: नालासोपाऱ्यात मतदानापूर्वीच 'लक्ष्मी दर्शन'? पेल्हार पोलिसांनी मध्यरात्री जप्त केली रोकड, काय आणि कसं घडलं?
रात्र वैऱ्याची आहे, मुंबई आपली आहे
पत्राच्या शेवटी त्यांनी अत्यंत भावनिक साद घालत म्हटले आहे की, ही लढाई केवळ उमेदवारांची नाही, तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि भविष्यातील मुंबईची आहे. "मी मनसेचा नेता म्हणून नाही, तर तुमचा 'आपला बाळा' म्हणून विनंती करतोय की, घराघरात जाऊन हा विश्वास जागवा," अशा शब्दांत त्यांनी मतदारांना साद घातली आहे.