Israel-Iran War : पश्चिम आशियात भडकलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इरान युद्धाचे पडसाद आता महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावर उमटू लागले आहेत. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना या आंतरराष्ट्रीय संघर्षाचा मोठा फटका बसला असून, केळीच्या निर्यातीवर गदा आली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली असून शेतकरी संकटात सापडले आहेत.
केळीच्या दरात मोठी घसरण आणि निर्यात ठप्प
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असून येथून मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात केली जाते. मात्र, युद्धामुळे निर्यात बंद झाल्याने केळीचे भाव कोसळले आहेत. अवघ्या 15 दिवसांपूर्वी ज्या केळीला 2,500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता, तो आता व्यापाऱ्यांकडून केवळ 1,500 ते 1,600 रुपये मागितला जात आहे. म्हणजे प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांचे थेट 1,000 रुपयांचे नुकसान होत आहे. आगामी रमजान महिन्यात केळीला मोठी मागणी असते, मात्र याच काळात निर्यात बंदी आणि दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Farm Subsidy Update: निधीअभावी 'या' योजनेला सरकारकडून ब्रेक; हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित
वाढता उत्पादन खर्च आणि निसर्गाची साथ नाही
एकीकडे युद्धाच्या जागतिक संकटामुळे आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. खते, बियाणे आणि इतर कृषी साहित्याचे दर कडाडल्याने शेती करणे महागात पडत आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे बागा करपत आहेत आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उत्पादनात घट आणि दरातील घसरण अशा कात्रीत शेतकरी अडकला आहे. इराणच्या नेत्याच्या मृत्यूनंतर युद्ध अधिक भडकण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने, आगामी काळ शेतकऱ्यांसाठी अधिक खडतर असणार आहे.
आयातीवरही परिणाम; शेतकऱ्यांची केंद्र सरकारकडे ही मागणी
इस्रायल हे कृषी तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. मात्र, युद्धामुळे इस्रायलमधून भारतात येणारी कृषी उत्पादने आणि तंत्रज्ञानाची आयात देखील विसकळीत झाली आहे. याचा थेट परिणाम भारतीय शेती आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांवरही होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जागतिक पातळीवर युद्ध थांबवण्यासाठी आणि निर्यात पूर्ववत करण्यासाठी पावले उचलावीत, जेणेकरून भारतातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच, आर्थिक नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी, अशी विनंतीही जळगावच्या केळी उत्पादकांनी केली आहे.
हेही वाचा - Maharashtra Unseasonal Rain: निसर्गाचा लहरीपणा; उन्हाच्या झळांनंतर अवकाळीचा तांडव; मराठवाड्यात तब्बल 19 हजार हेक्टरवरील पिके मातीमोल