मुंबई: रणरणत्या उन्हाच्या झळांनी व्याकुळ झालेल्या जिवाला अखेर गारव्याची चाहूल लागली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकली असली, तरी आता निसर्गाने कूस बदलली असून मान्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon) देशासह राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. आभाळ दाटून आले असून वाऱ्याची झुळूक थंडाव्याचा सांगावा घेऊन आली आहे. मात्र, हा गारवा केवळ दिलासादायक नसून, सोबतीला धुळीची वादळे आणि विजांचा कडकडाट घेऊन येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 8, 9 आणि 10 मे या तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारतासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) दिला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
यंदाच्या पावसावर 'अल निनो' आणि 'सुपर अल निनो'चे काळे सावट असले, तरी मान्सूनपूर्व पावसाने मात्र आपला वेग कायम ठेवला आहे. उत्तर-पश्चिम भारतामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीसह पंजाब-हरियाणामध्ये ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. डोंगरदऱ्यांपासून ते मैदानी प्रदेशांपर्यंत पावसाचा हा 'ट्रेलर' पाहायला मिळणार आहे. विशेषतः जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हा पाऊस काहीसा दिलासा देणारा ठरेल.
महाराष्ट्राच्या हवामानातही या तीन दिवसांत मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भाच्या टोकापर्यंत वरुणराजा आपली हजेरी नोंदवेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 'आभाळमाया' दाटून येईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रती तास वेगाने वावटळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Tamil Nadu Election 2026: तामिळनाडूत राजकीय भूकंप! 'या' कारणामुळे 107 आमदार देणार सामूहिक राजीनामा; थलापती विजयची नवी खेळी?
दक्षिण आणि मध्य भारताच्या पट्ट्यातही पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू होणार असून, या संपूर्ण पट्ट्यात धुळीच्या वादळांचा तडाखा बसू शकतो. विदर्भापासून बंगालपर्यंत पसरलेल्या या ढगांच्या गर्दीमुळे तापमानात घट होईल, परंतु विजा पडण्याच्या घटनांची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
एकूणच काय, तर जुलै महिन्यात अल निनोमुळे पावसाच्या वितरणात बदल होण्याची चिन्हे असली, तरी मे महिन्यातील हा मान्सूनपूर्व पाऊस मात्र त्याची दमदार बॅटिंग करणार हे निश्चित आहे. निसर्गाचा हा लहरीपणा कधी थंडावा देणारा, तर कधी विजांच्या रूपाने धास्ती निर्माण करणारा ठरत आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेण्यासोबतच हवामान खात्याच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
हेही वाचा: Actor Death Rumor: 'मी अजून जिवंत आहे'; व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याचा संताप, कायदेशीर कारवाईचा दिला इशारा