मुंबई: महाराष्ट्रात नव्या दृष्टीकोनातून पत्रकारितेचा आरंभ करणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीने आज आपल्या यशस्वी प्रवासाची 12 वर्षं पूर्ण करत 13 व्या वर्षात भक्कम पाऊल टाकलं आहे. 1 मे 2013 रोजी स्थापन झालेली ही मराठी वृत्तवाहिनी अल्पावधीतच आपल्या निर्भय आणि निःपक्षपाती पत्रकारितेच्या जोरावर महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरीलही मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. पत्रकारितेच्या गजबजलेल्या विश्वात ‘जय महाराष्ट्र’ हा विश्वासार्हतेचा आणि ठाम मतांचा चेहरा बनलाय.
वाहिन्यांच्या भाऊगर्दीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ने आजवर राज्यातील कोपऱ्याकोपऱ्यातील बातम्या आणि घडामोडी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. ‘चांदा ते बांदा’ असो किंवा ‘कोकण टू कॅलिफोर्निया’, या वाहिनीच्या सादरीकरणात स्थानिक ते जागतिक पातळीवरील बातम्यांचा समतोल दिसून येतो. त्यामुळेच ‘जय महाराष्ट्र’वरची प्रत्येक बातमी ही केवळ माहितीपुरती मर्यादित राहत नाही, तर अनेकदा ती सरकार आणि प्रशासनासाठी ‘इम्पॅक्ट’ ठरणारी ठरते.
‘जय महाराष्ट्र’ ही सहाना फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडची संकल्पना असून, सहाना ग्रुप ऑफ कंपनीजचा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या 12 वर्षांपासून वाहिनीने सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी आणि त्यांच्या हितासाठी सदैव सजग असणारी भूमिका घेतली आहे. म्हणूनच प्रेक्षकांचा विश्वास हाच ‘जय महाराष्ट्र’ची खरी ताकद ठरतो. पत्रकारितेच्या प्रत्येक पायरीवर प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि जाज्वल्य मराठी अभिमान हीच आमची ओळख राहिली आहे.
आजच्या 12व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘जय महाराष्ट्र’ आपल्या सर्वच प्रेक्षकांचे, सहकाऱ्यांचे, तंत्रज्ञांचे आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे आभार मानते. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभप्रसंगी, आम्ही पुन्हा एकदा नवे संकल्प घेऊन पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो आहोत. सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रांमधील महत्त्वाच्या बातम्या आम्ही भविष्यातही तितक्याच जबाबदारीने सादर करत राहू.
‘जय महाराष्ट्र’ची ही वाटचाल केवळ पत्रकारितेपुरती मर्यादित नसून, ती एक जबाबदारी आहे लोकशाहीला सक्षम ठेवण्याची. आजवरच्या प्रवासात आपल्याकडून मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीकडून मनःपूर्वक आभार मानतो आणि अशीच साथ भविष्यातही लाभावी हीच अपेक्षा व्यक्त करतो.