कोल्हापूर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय हवा वेगाने बदलत आहे. नगर पालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता सर्वांच्या नजरा जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीकडे लागल्या आहेत. अशातच, दक्षिण महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'धनुष्यबाण' हाती धरला आहे.
सतेज पाटलांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग
कोल्हापूरच्या राजकारणात 'आबाजी' म्हणून परिचित असलेले विश्वासराव पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेससाठी 'घरचा आहेर' ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासराव पाटलांचे पक्षात स्वागत करताना, "हा केवळ प्रवेश नसून कोल्हापूरच्या विकासाची नवी नांदी आहे," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा: Nana Patole Letter to CM: 'लोकशाही धोक्यात...'; महापालिका निकालानंतर नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, 'ही' मोठी मागणी केली
बड्या नेत्यांची मांदियाळी शिवसेनेत
केवळ विश्वासराव पाटीलच नव्हे, तर त्यांच्यासोबत सहकार आणि स्थानिक राजकारणातील दिग्गज मंडळींनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने, सचिन पाटील (सरपंच, शिरोली दुमला), बुद्धिराज शंकर पाटील महेकर (अध्यक्ष, हनुमान दूध संघ), नंदकुमार अण्णासाहेब पाटील (संचालक, यशवंत सहकारी बँक कुडित्रे) तसेच अनिल सोलापुरे, राहुल पाटील, एस.के. पाटील आणि सुनील पाटील यांसारख्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
'करवीर'मध्ये शिवसेनेची ताकद वाढणार
या पक्षप्रवेशावेळी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांची उपस्थिती लक्षणीय होती. विश्वासराव पाटील यांच्या प्रवेशामुळे करवीरसह संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचे (शिंदे गट) पारडे जड झाले आहे. सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव असलेले पाटील सोबत आल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'गोकुळ'च्या राजकारणात नवे वळण?
विश्वासराव पाटील हे गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष असल्याने, त्यांच्या या निर्णयाचा थेट परिणाम जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावरही होणार आहे. "कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे," असे विश्वासराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. आता या बंडाळीनंतर काँग्रेस या धक्क्यातून कशी सावरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा: A R Rahman : 'विकी कौशलचा 'छावा' समाजात फूट पाडणारा चित्रपट; ए. आर. रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य