रायगड : कोंढाणे धरणाच्या कामाला 15 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईला मुबलक पाणी मिळणार आहे. आधी कर्जत तालुक्याला पाणी द्या नंतर नवी मुंबईला द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.
लघु पाटबंधारे घोटाळ्यात अडकलेल्या कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरणाच्या कामाला तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा प्रारंभ होत आहे. शासनामार्फत या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुरुवातीला हे धरण शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत होतं पण आता हा प्रकल्प सिडकोकडे वर्ग करण्यात आला असून या धरणामुळे नवी मुंबईत होऊ घातलेला नयना प्रकल्प आणि एअर पोर्ट सहित 270 गावांना मुबलक पाणी मिळणार आहे. धरण, प्रभावित होणारे क्षेत्र, विस्थापन आणि पुर्नवसन, जुनी देणी आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.
हेही वाचा : गोंदियात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; अवकाळीचा धान पिकाला फटका बसण्याची शक्यता
कोंढाणेची कोंडी फुटणार?
2011 मध्ये कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे काम सुरु होते. कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे कोंढाणे धरणाचे काम अनेक वर्ष स्थगित होते. 2017 मध्ये कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित करण्यात आले. स्थानिकांना 10 टक्के पाणीसाठा, उर्वरित पाणीसाठा सिडकोला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 500 हेक्टरहून अधिक जमीन धरणासाठी देणाऱ्या कर्जतवर अन्याय झाल्याचा आरोप होतं होता. दरम्यान धरणासाठी तालुक्यातील चार गावं प्रकल्पबाधित असून आधी कर्जत तालुक्याला पाणी देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.