कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःचं जीवन संपवलं अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. माणगावजवळील मोरे गावातील कु. विराली विठ्ठल रेमुळकर ही स्थानिक वाडोस हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. सध्या राज्यभर दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षेचा ताण आणि मानसिक दडपण यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ कुडाळ पोलीस ठाणे येथे कळवले. माहिती मिळताच कुडाळ आणि माणगाव येथील पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे रेमुळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात आणि शाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.