घोटी वाडीवऱ्हे शिवारात ऑक्टोबर 2025 मध्ये अपहरण, ठार मारण्याची धमकी, खंडणी आणि तब्बल 400 कोटी रुपयांच्या नोटांचे कंटेनर लुटल्याचा प्रकार उघडकिस आला होता. अशातच आता तब्बल 400 कोटी रुपयांची कंटेनर चोरी केल्याच्या प्रकरणात राजकीय आणि बिल्डराचा हात असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या तपासातून ही 400 कोटी रुपयांची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी संदीप पाटील नावाच्या तरुणाने एका व्हिडीओमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.
काय म्हणाला संदीप पाटील?
मी संदीप पाटील. 16 ऑक्टोबर 2025 रोजी कर्नाटकमधील चोरला घाटामध्ये दोन कंटेनरमध्ये 400 कोटी रुपये होते. हे पैसे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात होते. कंटेनर जेव्हा कर्नाटकमधील चोरला घाटात पोहोचले तेव्हा चोरांनी रात्रीच्या अंधारात लुटले होते. या कंटेनरमध्ये 2000 रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. त्या नोटांचा मुळ मालका हा ठाण्यातील किशोर सावळा आहे. त्यांचे हे पैसे होते.
पुढे तो म्हणाला की, "त्यांच्या जवळचा माणूस जयश कदम याने 20 ऑक्टोबर रोजी रात्री व्हॉट्सअपवर फोन केला. तुझ्या नावाची तक्रार आली आहे. तुझी आम्हाला चौकशी करायची आहे, उद्याच्या उद्या मला घोटीला भेटायला ये. त्यानंतर 21 तारखेला दिवाळी असल्यामुळे मी 22 तारखेला घोटीला भेटायला गेलो, त्यांनी मला बळजबरीने त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये बसवलं. त्यांनी मला नाशिकला घेऊन गेले. या गाडीत विशाल नायडू, सुनील धुमाळ होते. त्यांनी मला तूच भाऊ पाटील आहे, तूच आमच्या शेटचा कंटेनर लुटला आहे. ते आरोपी तुझ्या नावाने फोन करत आहे, ते 100 कोटी रुपये लुटले आहे का? असं म्हणत मला मारहाण केली", असं संदीप पाटील याने एका व्हिडीओमध्ये सांगितलं.