मुंबई: फेब्रुवारी महिन्याचा शेवट जवळ येत असताना महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची नोंद झाली होती. मात्र आता परिस्थिती पुन्हा बदलली असून राज्यात उष्णतेचा प्रभाव वाढताना दिसत आहे. सकाळच्या वेळी किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर कडक उन्हामुळे नागरिक हैराण होत आहेत. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये उकाडा वाढू लागला आहे. सकाळी वातावरण तुलनेने सुखद असते, पण दुपारी सूर्याच्या तडाख्यात लक्षणीय वाढ होत आहे. आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. शहरात कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसदरम्यान पोहोचण्याची शक्यता असून किमान तापमान 23 ते 25 अंशांच्या आसपास राहील. आकाश प्रामुख्याने स्वच्छ किंवा किंचित ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा: Budget Session : राज्याच्या विकासाचा तिहेरी अजेंडा! AI, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कर्जमाफीवर विशेष भर; अर्थसंकल्पात काय असणार?
ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी परिसरातही दमट आणि उष्ण हवामान राहील. समुद्रकिनारी भागात आर्द्रतेमुळे उकाडा अधिक त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे दुपारच्या वेळेत अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागांत सकाळी वातावरण काहीसे आल्हाददायक असले तरी दुपारी कडक उन्हामुळे त्रास वाढणार आहे. या भागांत कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान प्रामुख्याने कोरडे राहील.
मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवेल. छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि नांदेड येथे दुपारच्या सुमारास तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानात वाढ नोंदवली जाऊ शकते. आकाश बहुतांश स्वच्छ राहील आणि पावसाची शक्यता अत्यल्प आहे. विदर्भात उष्णतेची झळ अधिक तीव्र राहणार आहे. चंद्रपूर येथे तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. काही भागांत उष्णतेची लाट सुरू होण्याची चिन्हे दिसत असली तरी अद्याप अधिकृत हीटवेव्हचा इशारा देण्यात आलेला नाही.
हेही वाचा: Devendra Fadnavis On Narhari Zirwal : "त्या प्रकरणामध्ये कुठेही मंत्र्याचं नाव नाही" फडणवीसांकडून झिरवाळांना क्लिनचीट
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा ओढणी वापरावी, पुरेसे पाणी प्यावे आणि हलके, सैलसर कपडे परिधान करावेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष दक्षता घ्यावी. हिवाळ्याचा प्रभाव आता जवळपास संपुष्टात आला असून राज्यात उन्हाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उष्णतेपासून बचावासाठी योग्य ती तयारी आतापासूनच करणे आवश्यक ठरेल.