राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्षाचा नेता प्रचारामध्ये गुंतलेला दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे आयोजित ‘देवाभाऊ! मिसळ कट्टा: कोल्हापूरकरांचा संवाद देवाभाऊंशी’ या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. याठिकाणी अभिनेते स्वप्नील राजशेखर व कृष्णराज महाडीक यांनी त्यांची मुलाखत घेतली.
यावेळी त्यांना त्यांच्या आवडीनिवडीबद्दल विचारण्यात आले. यामध्ये तुमचा आवडता गायक कोण? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “एक गायक सांगणं कठीण आहे. जुन्या गायकांमध्ये किशोर कुमार, मोहम्मद रफी आवडायचे. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा कुमार सानू, उदित नारायण, अभिजीत आवडत असत. मग त्यानंतर सुखविंदर सिंग, शाम आले. सोनू निगम आले. मध्यंतरी हरिहरन, शंकर महादेवन आले, त्यांनी इंडस्ट्री गाजवली. आजचा आवडता गायक अरिजित सिंग आहे.”
दरम्यान मुलाखतकारांनी त्यांना एक गाणं गाण्याची फर्माइश केली.यावेळी ते म्हणाले कि, "हे लोक इथं शांत बसले आहेत, मी गायला लागलो तर भूकंप आल्यासारखे पळतील. मी तुम्हाला सांगतो आमच्या घरात आमचा अलिखित करार आहे. मला गाणी पाठ आहेत. पूर्वी मी गाण्याच्या भेंड्या खेळायचो. तेव्हा मी म्हणायचो की तू मुखडा म्हण, कारण मला गाण्याचे शब्द पाठ असायचे. पण मला एकही गाणं सुरात म्हणता येत नाही. सुरात गाणं गाण्याची जबाबदारी बायकोची आणि त्याचे शब्द सांगायची जबाबदारी माझी.”