उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गारठला आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला असून नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे अनेक भागांत थंडीचा जोर वाढला असून, काही ठिकाणी थंडीची लाट जाणवत आहे. उर्वरित महाराष्ट्रातही गारठा कायम आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असली, तरी थंडी पूर्णपणे ओसरणार नाही, असा अंदाज भारतीय हवामान विभाग यांनी वर्तवला आहे. दरम्यान, दिवसाच्या कमाल तापमानात मात्र चढ-उतार होत राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- Pune Election 2026: पुण्याच्या राजकारणात खळबळ, मतदानाला काही तास उरले असतानाच धंगेकरांचा 'व्हिडीओ बॉम्ब', वाचा सविस्तर
आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. त्याचसोबत मराठवाडा आणि विदर्भ येथे थंडीचे वारे अजूनही वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके राहिलं. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड येथे तसेच विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा येथे किमान तापमान 11 ते 13 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस इतके राहिल. नागपूर, यवतमाळ, गोदिंया, भंडारा आणि जळगावमध्ये 11 अंश सेल्सिअस आणि धुळ्यात 7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. 16 ते 19 जानेवारीपर्यंत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलक्या पावसाची सर येणार असून पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेश येथे मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.