पुणे: महाराष्ट्रात सध्या हवामानाने अक्षरशः कोलांटउडी घेतली आहे. डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका अनुभवलेल्या राज्यात आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उकाड्याची चाहूल लागली आहे. “हिवाळा की उन्हाळा?” असा प्रश्न नागरिकांना पडावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहाटे गारवा, दुपारी उन्हाचा चटका आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण असे एकाच दिवशी तीन ऋतूंचा अनुभव देणारे हे चित्र सध्या राज्यभर दिसत आहे.
जानेवारीपासून तापमानात सातत्याने चढउतार होत असून कमाल आणि किमान तापमानातील फरक वाढत चालला आहे. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानात अर्धा ते एक अंश सेल्सिअसने घट नोंदवली गेली. त्यामुळे पहाटे आणि उशिरा रात्री थंडीचा प्रभाव काहीसा वाढलेला जाणवतो. मात्र दुपारनंतर उन्हाचा तडाखा आणि त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे निर्माण होणारा उकाडा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.
राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली असून 9.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यावरून काही भागात अजूनही थंडीचा प्रभाव कायम असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, काही जिल्ह्यांत पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तापमानात चढउतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा: 8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'आनंदाची बातमी'; आठव्या वेतन आयोगाची प्रश्नावली प्रसिद्ध; 'या' प्रश्नांची उत्तरे द्या आणि पगारवाढ मिळवा?
दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर उत्तरेकडे हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे. म्हणजेच देशाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या ऋतूंचे चित्र एकाच वेळी पाहायला मिळत आहे. हवामानातील बदलांचा फटका सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे.
हवामानातील या अनिश्चित बदलांचा परिणाम आरोग्यावरही होत आहे. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यातच वायू प्रदूषणाची पातळी वाढल्याने श्वसनाचे विकार डोके वर काढत आहेत. सकाळचा गारवा आणि दुपारचा उकाडा यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती ढासळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना योग्य काळजी घेणे आणि आरोग्याची निगा राखणे, हीच काळाची गरज ठरत आहे.
हेही वाचा: T20 World Cup: गोलंदाजांची धार अन् सूर्याचा प्रहार; अमेरिकेचा 29 धावांनी पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने रोवला विजयाचा झेंडा