पुणे: महाराष्ट्रातील हवामानात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. एका बाजूला अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये पुढील 24 तासांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सियस तर किमान तापमान 25 अंश सेल्सियसच्या आसपास राहू शकते. 22 आणि 23 एप्रिल 2026 दरम्यान मुंबई आणि ठाणे येथे हलका पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सरी पडण्याचा अंदाज आहे.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, बीड, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, तर काही ठिकाणी 50 किलोमीटर प्रतितास वेगाने झोत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Donald Trump: पाकिस्तानची मध्यस्थी आणि ट्रम्प यांची नरमाई! इराणवर होणारे हल्ले तूर्तास थांबले; पण इराणचा मात्र संशय
पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे 25 एप्रिल 2026 पर्यंत असेच हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण, उकाडा आणि सायंकाळी हलक्या सरी अनुभवायला मिळू शकतात.
दरम्यान, राज्यातील अंतर्गत भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. अकोला येथे तापमान 43.6 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. मालेगाव, बीड आणि औरंगाबाद येथेही तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. किनारी भागांमध्ये तापमान तुलनेने कमी असले तरी आर्द्रता जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवत आहे.
हेही वाचा: RBI Auto Debit Norms: बँक खात्यातून पैसे कट होण्यापूर्वी आता तुमची परवानगी लागणार! RBI ने ऑटो डेबिटचे नियम बदलले; ग्राहकांना मोठा दिलासा