मुंबई: सध्या महाराष्ट्र निसर्गाच्या एका विचित्र कात्रीत सापडला आहे. एकीकडे सूर्याने जणू आग ओकायला सुरुवात केली असून पारा 43 अंशांच्या पार गेला आहे, तर दुसरीकडे 'न बोलावता आलेल्या पाहुण्यासारखा' अवकाळी पाऊस राज्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज, 9 मे 2026 रोजी राज्याच्या हवामानात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, अर्ध्या महाराष्ट्रावर वादळी पावसाचे संकट घोंगावत आहे. मे महिन्यातील हे 'अस्मानी संकट' नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारे ठरत असून, हवामान विभागाने विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान बदलाच्या या गुंतागुंतीच्या खेळाचे मुख्य कारण म्हणजे मध्य प्रदेशापासून ते कोमोरीन भागापर्यंत सक्रिय असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा. या पट्ट्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर आर्द्रता जमा झाली असून, पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. परिणामी, विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. येथे केवळ पाऊसच नाही, तर ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सर्वसामान्यांची दाणादाण उडवू शकतो.
दुसरीकडे, स्वप्नांच्या मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वेगळीच परिस्थिती आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड पट्ट्यात पावसापेक्षा 'दमट' हवामानाचा जाच अधिक जाणवणार आहे. 80 टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आर्द्रता आणि 35 अंशांच्या आसपास असलेले तापमान यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दक्षिण कोकणात मात्र पुढील 48 तास अवकाळी पावसाचे सावट गडद असल्याने पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा: Newly Appointed CDS: भारतीय संरक्षण दलात मोठी खांदेपालट! लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणि देशाचे नवे CDS; तिन्ही दलांची सूत्रे हाती
उत्तर महाराष्ट्रात मात्र निसर्गाचे रूप पूर्णपणे भिन्न आहे. नाशिक, जळगाव आणि धुळे परिसरात पावसाची चिन्हे नसली तरी उन्हाचा तडाखा 'आगीतून फुफाट्यात' टाकणारा ठरणार आहे. येथील पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, उन्हाच्या तीव्र झळांमुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. "दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नका," असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. उन्हाच्या या तीव्रतेमुळे शेतीकामांनाही ब्रेक लागला आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आज 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. येथील घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीट होऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढगाळ हवामानामुळे तापमानात किंचित घट झाली असली, तरी उकाड्यापासून मात्र सुटका मिळालेली नाही. छत्री उन्हासाठी वापरायची की पावसासाठी, अशा संभ्रमात सध्या इथला नागरिक अडकला आहे.
एकूणच, मे महिन्याचा हा उत्तरार्ध महाराष्ट्रासाठी 'दुहेरी संकट' घेऊन आला आहे. तापमानाचा वाढता पारा आणि सोबतीला असणारा अवकाळी पावसाचा लहरीपणा यामुळे आरोग्याचे प्रश्नही उभे ठाकले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यातील वातावरण असेच अस्थिर राहणार आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे न राहणे आणि शक्य असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे, हाच या अस्मानी संकटातून वाचण्याचा मार्ग आहे.
हेही वाचा: Nida Khan: नाशिक TCS धर्मांतरप्रकरणी राष्ट्रिय महिला आयोगाचा अहवाल फडणवीसांसमोर सादर