राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. भर दिवाळीच्या सणात आलेल्या या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची मोठी धावपळ झाली आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे फटाक्यांचा व्यवसाय करणाऱ्यांनाही फटका बसला आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, दिवाळी सणावर पावसाचे सावट पसरले आहे.
मुंबईत सायंकाळच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. दादर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तेव्हाच बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होती. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी पावसापासून बचावासाठी दुकानदारांच्या आडोशाला आश्रय घेतला.
हेही वाचा: Deepika Padukone And Ranveer Singh Dughter first Look : किती ते गोंडस ! अखेर दीपिका-रणवीरच्या लेकीचा चेहरा समोर
ठाण्यातदेखील विजांच्या आवाजासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, दिवाळी निमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या लोकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात काही वेळ मुसळधार पाऊस झाला. मात्र, या पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बदलापूरमध्येही पावसाने उपस्थिती दर्शवली. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे हवेत थंडावा निर्माण झाला आणि उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.अचानक आलेल्या पावसाने बदलापूरकरांची तारांबळ उडाली.
कल्याणमध्ये दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाहनचालकांना संतुलन राखण्यात अडचणी आल्या. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच सण साजरा करावा लागला.
दिवाळीच्या काळात आलेल्या या अनाहूत पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी ऑक्टोबर हीटने वैतागलेल्या नागरिकांना हवेत निर्माण झालेल्या गारव्यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसले आहे.
हेही वाचा: Today's Horoscope 2025 : दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात होतील काही खास बदल; वाचा आजचं राशिभविष्य