Wednesday, April 22, 2026 10:28:19 PM

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी 14 महिन्यांनंतर कारागृहाबाहेर; 'या' कारणासाठी कोर्टाने दिली परवानगी

सरकारी पक्षाने या अर्जाला कडाडून विरोध केला असला, तरी मानवीय दृष्टिकोनातून न्यायालयाने काही कठोर अटींवर ही परवानगी मंजूर केली आहे.

santosh deshmukh case संतोष देशमुख मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी 14 महिन्यांनंतर कारागृहाबाहेर या कारणासाठी कोर्टाने दिली परवानगी

Santosh Deshmukh Case: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयराम चाटे हा सव्वा वर्षांनंतर पहिल्यांदाच जेलबाहेर आला आहे. भावाच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींसाठी न्यायालयाने त्याला अटी व शर्तींसह अवघ्या काही तासांसाठी ही सवलत दिली आहे. या निर्णयामुळे परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजले आहेत.

न्यायालयाच्या कडक अटी आणि वेळेचे बंधन
जयराम चाटे याच्या भावाचे 2 मार्च रोजी निधन झाले होते. त्यानंतरच्या 'उत्तरकार्या'साठी (12 व्याचा विधी) उपस्थित राहता यावे, यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. सरकारी पक्षाने या अर्जाला कडाडून विरोध केला असला, तरी मानवीय दृष्टिकोनातून न्यायालयाने काही कठोर अटींवर ही परवानगी मंजूर केली आहे. आज, 13 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच त्याला गावी राहण्याची मुभा देण्यात आली असून, पोलीस बंदोबस्तासाठी येणारा सर्व खर्च स्वतः आरोपीलाच करावा लागणार आहे.

पीडित कुटुंबाचा विरोध आणि सुरक्षेचा प्रश्न
आरोपीला मिळालेल्या या तात्पुरत्या सुटकेवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. "हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून महाराष्ट्राने आरोपींची गुन्हेगारी प्रवृत्ती पाहिली आहे. अशा परिस्थितीत आरोपी गावात आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो," असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रशासनाला विशेष खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

हेही वाचा - Cyber Fraud : पोलिसांची मोठी कारवाई; नायजेरियापर्यंत पसरलेलं 'सोलर स्पायडर'चं जाळं उद्ध्वस्त; 80 कोटींचा कट उधळला

तांबवा गावात कडेकोट बंदोबस्त
विधीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आरोपीचे मूळ गाव असलेल्या तांबवा येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला एका प्रकारे छावणीचे स्वरूप आले असून, प्रत्येक हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, दुपारी 4 वाजल्यानंतर आरोपीची पुन्हा बीड जिल्हा कारागृहात रवानगी केली जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री