मुंबई:आयपीएल मॅचचा आनंद काही जणांसाठी घातक ठरतोय. अशीच एक धक्कादायक घटना कांदिवलीमध्ये घडली जिथे फोनवर मोठ्याने बोलल्याच्या कारणावरून दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि हा वाद थेट हत्येपर्यंत गेला. मॅच दरम्यान फोनवर बोलत असलेल्या तरुणाला रागाच्या भरात इमारतीतून खाली फेकल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना कांदिवलीच्या साईबाबा नगर परिसरात घडली. जितेंद्र चौहान (वय 30) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो आयपीएल मॅच दरम्यान फोनवर कोणाशी तरी मोठ्याने बोलत होता. त्याच्याजवळच राहणाऱ्या अफसर जमीर आलम (वय 25) याला त्याचे बोलणं त्रासदायक वाटलं. सुरुवातीला दोघांमध्ये किरकोळ वाद झाला, मात्र तो पुढे विकोपाला गेला.
हेही वाचा :राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी महत्वाचा निर्णय; मत्स्य व्यवसायाला मिळाला कृषी दर्जा
साक्षीदारांच्या माहितीनुसार, अफसर आलमने रागाच्या भरात जितेंद्रसोबत जोरदार भांडण केलं आणि नंतर त्याला थेट इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. ही घटना इतकी धक्कादायक होती की परिसरातील लोक एक क्षणभर स्तब्ध झाले. खाली पडल्यामुळे जितेंद्र गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अफसर आलमला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा तपासलं जात आहे.
ही घटना केवळ एका किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे दाखवते. सध्या आयपीएल मॅचमुळे अनेकजण रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहतात, गोंगाट करतात. पण त्यामुळे निर्माण होणारे वाद अशा टोकाच्या पातळीला जातील, अशी कुणाचीही कल्पना नसेल.