विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. सद्यःस्थितीत 142 गावे, 24 वाड्यांना 4 शासकीय व 211 खासगी असे मिळून 215 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. एकट्या जिल्ह्यात टँकरची संख्या 154 एवढी झाली आहे. तापमानात होणारी वाढ पाहता आगामी काळात पाणीटंचाई अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी पाऊसमान चांगले झाल्याने टंचाई निर्माण होणार नाही, असा अंदाज होता. परंतु मार्च महिन्यातच अनेक गावात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला. पाण्याचे स्त्रोत आटल्याने तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून आजच्या घडीला 105 गावे व 15 वाड्यांना मिळून खासगी 154 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासह जालना जिल्ह्यातील 30 गावे आणि 8 वाड्यांना 3 शासकीय व 52 खासगी असे मिळून एकूण 55 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील 5 गावांना 5 टँकरद्वारे तसेच लातूर जिल्ह्यातील एका गावाला एका टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. अशा प्रकारे मराठवाड्यातील या चार जिल्ह्यातील तहानलेले एकूण 142 गावे व 24 वाड्यांना 4 शासकीय व 211 खासगी असे मिळून 215 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
हेही वाचा : Pahalgam terror attack: संतोष जगदाळेंवर मुलगी आसावरी जगदाळेने केले अंत्यसंस्कार
267 खासगी विहिरींचे अधिग्रहण
पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनू शकतो. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता परभणी जिल्हा वगळता विभागातील सातही जिल्ह्यातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 21 एप्रिलच्या अहवालानुसार 267 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यात 107, जालना 57, हिंगोली 44, नांदेड 44, लातूर 10, धाराशिव 2 तर बीड जिल्ह्यात 3 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात टँकरसाठी 92 गावातील 107 विहिरीचे तर टँकर व्यतिरिक्त 136 गावातील 160 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.