मुंबई : राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. याबाबतची माहिती गेल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. ही निवडणूक रायगड, रत्नगिरी, सिधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, परभणी व लातूर या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकृत एक्स पोस्टवर शेअर केली आहे.
हेही वाचा : Mahapalika elections 2026: मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपणार! 'या' दिवशी होणार आरक्षण सोडत, राज्याच्या राजकारणाला नवी दिशा
जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून 731 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये 361 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून अनुसूचित जमातींसाठी 83 तर अनुसूचित जमातींसाठी 25 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मागासवर्ग प्रवर्गांसाठी 191 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे पंचायत समित्यांच्या एकूण 125 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये एकूण 1,462 जागा आहेत. यात 731 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून अनुसूचित जातींसाठी 166 तर अनुसूचित जमातींसाठी 38 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.