छत्रपती सांभाजीनगर: राज्यातील विमान अपघात प्रकरण, बदलती राजकीय समीकरणे, ईव्हीएमवरील आरोप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरण यांसारख्या विविध राजकीय मुद्द्यांवर समाजकल्याण मंत्री मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात सुरू असलेल्या घातपाताच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना अंतिम अहवाल आल्यानंतरच सर्व शंकांचे निरसन होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या जीवितास धोका असल्याची भावना असल्यास त्यांनी अधिकृतरीत्या सुरक्षेची मागणी करावी. तपास करून आवश्यक असल्यास त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात येईल आणि त्यांना संरक्षण देण्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही.
दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यांवर टीका करत शिरसाट म्हणाले की, सध्या गणेश नाईक नेमके कोणत्या विषयावर बोलत आहेत हेच समजत नाही. नाईक कोणत्या खात्याचे मंत्री आहेत हे सुद्धा माहित नाही. कधी मुंबई, कधी ठाणे, कधी गुजरात तर कधी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ते वक्तव्य करत असून त्यामुळे भाजप सरकारलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा: UPI Fraud Cases : UPI फसवणुकीवर उच्च न्यायालयाचा संताप; केंद्र सरकार, RBI आणि NPCI कडून मागितलं स्पष्टीकरण
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना शिरसाट म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत कोण कोणासोबत युती करेल हे सांगणे कठीण झाले आहे. राजकारणातील घडामोडी वेगाने बदलत असल्याने भविष्यातील समीकरणांचा अंदाज बांधणे अवघड आहे.
शरद पवार यांच्या संभाव्य राज्यसभा उमेदवारीबाबत विचारले असता, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यास ते राज्यसभेवर जाऊ शकतात. मात्र त्यांनी राज्यसभेत जावे की नाही, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.
निवडणुकांदरम्यान ईव्हीएम संदर्भात होणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, पराभवानंतर अनेकदा त्याचे खापर ईव्हीएम, पैशांचे वाटप किंवा भ्रष्टाचारावर फोडले जाते. आरोप करण्याऐवजी संबंधितांनी कायदेशीर मार्गाने लढा द्यावा. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत बोलताना सध्याची राजकीय परिस्थिती पाहता असे विलीनीकरण होण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया