मुंबई: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भ्याड हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली भूमिका मंडली . मुंबईतील विलेपार्ले येथे पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या 83व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशाच्या सुरक्षेचा मुद्दा, हिंदू धर्माची भूमिका आणि सध्याच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य केलं.
भागवत म्हणाले, सध्या सुरू असलेली लढाई ही कोणत्याही धर्मांमधली नाही, तर ‘धर्म’ आणि ‘अधर्म’ यांच्यातली आहे. भारताने कधीही कुणावर त्यांच्या धर्मामुळे हल्ला केला नाही, परंतु दहशतवादी निर्दोष लोकांचा धर्म विचारून त्यांचं प्राणहानी करतात. हे हिंदू संस्कृतीला कधीच मान्य नाही.
त्यांनी पुढे सांगितलं, रावण हा शिवभक्त होता, वेदांचे ज्ञान असलेला विद्वान होता, तरीही त्याचा अंत झाला, कारण त्याचा मनोवृत्ती बदलायला तयार नव्हता. जसा रावणाचा वध आवश्यक होता, तसाच आजच्या काळातील दहशतवाद्यांचाही नाश कारणही तितकच आवश्यक आहे. ही लढाई अशा असुरी वृत्तींच्या विरुद्ध आहे.
हेही वाचा:सिंधू पाणी करार थांबवला तर 'युद्ध' मानू; पाकिस्तानचा भारताला इशारा
भागवत यांनी सांगितलं की, द्वेष आणि शत्रुता आपला स्वभाव नाही. आपण नेहमीच सहिष्णुतेचा मार्ग अवलंबतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण गप्प बसून मार खाणार. शक्तिशाली असणं, आणि गरजेच्या वेळी ती शक्ती वापरणं हीच खरी अहिंसा आहे.
या भ्याड हल्ल्यात 27 निरपराध आणि निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अशा घटनांना फक्त निषेध करून उपयोग नाही, तर त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांनीही त्यांच्या या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिंदू धर्म हा मानवधर्म असल्याचं सांगत भागवत यांनी सर्वसामान्य जनतेला एकत्र येण्याचं आणि देशहितासाठी जागृत राहण्याचं आवाहन केलं.
देश शक्तिशाली आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी सरकारला आणि सुरक्षादलांना अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याचा संदेश दिला.