मुंबईतील हवा प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असून अनेक भागांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. विशेषतः वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात रविवारी हवेची स्थिती अत्यंत खराब असल्याची नोंद झाली. येथे ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ थेट 211 इतका नोंदला गेला, जो ‘अतिवाईट’ श्रेणीत मोडतो.
शहराचा एकूण सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक सध्या ‘मध्यम’ श्रेणीत कायम आहे. रविवारी हा निर्देशांक 135 इतका नोंदवण्यात आला. मात्र काही ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे चित्र समोर आले आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून मुंबईतील हवेत सातत्याने प्रदूषण वाढताना दिसत असून धुरकट वातावरणामुळे दृश्यमानताही कमी झाली आहे.
हवामानातील बदल, वाढते तापमान, वाऱ्याचा कमी वेग तसेच बांधकामांची धूळ, वाहनांची वाढती संख्या आणि औद्योगिक उत्सर्जन यामुळे हवा प्रदूषणात भर पडत आहे. नैसर्गिक कारणांसोबतच मानवनिर्मित घटकही या स्थितीस जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
समीर ॲपच्या नोंदीनुसार, रविवारी शहरातील बहुतांश भागांमध्ये हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. वांद्रे कुर्ला संकुल, चकाला, देवनार, मालाड, माझगाव, कुर्ला, भायखळा आणि घाटकोपर यांसारख्या भागांमध्येही प्रदूषणाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक होते. विशेषतः पीएम 2.5 आणि पीएम 10 या घातक कणांचे प्रमाण वाढल्याने श्वसनास त्रास होण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, काही भागांमध्ये तुलनेने दिलासादायक परिस्थितीही दिसून आली. पवई, मुलुंड पूर्व, भांडुप पश्चिम आणि बोरिवली पूर्व येथे हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदवण्यात आली. मात्र शहरातील एकूण चित्र पाहता प्रदूषणाचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हवा प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकला, दमा, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याचबरोबर तापमानातही वाढ होत असून उष्णतेमुळे प्रदूषणाचा परिणाम अधिक तीव्र जाणवत आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथील केंद्रांवर कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवण्यात आले. पुढील काही दिवस तापमान अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अनावश्यक बाहेर जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे आणि आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. प्रदूषणावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.