मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या रणधर्माचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आणि मुंबईच्या राजकारणात एका नव्या युगाची पहाट झाली. गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे ब्रँडचा बालेकिल्ला यंदा भाजप - शिवसेना (शिंदे गट) महायुतीने उद्ध्वस्त केला आहे. 'मराठी अस्मिता' आणि 'मुंबई कोणाची?' या मुद्द्यावर तापलेल्या वातावरणात अखेर मतदारांनी विकासाच्या गणिताला पसंती दिली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबईच्या या सत्तांतरात दादरचा प्रभाग क्रमांक 192 सर्वाधिक चर्चेचा ठरला. या ठिकाणी मनसेचे यशवंत किल्लेदार आणि शिंदे गटाच्या प्रिती पाटणकर यांच्यात अटीतटीची लढत होती. मराठी मनाचे हृदय समजल्या जाणाऱ्या दादरमध्ये किल्लेदारांनी विजयाचा गुलाल उधळला.
राज ठाकरे यांनी ज्यांना निवडणुकीचा पहिला 'एबी फॉर्म' दिला होता, त्या किल्लेदारांनी आपल्या नेत्याचा विश्वास सार्थ ठरवला. विजयानंतर किल्लेदारांनी थेट राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी धाव घेतली, जिथे राज ठाकरेंनी बाल्कनीत येऊन कार्यकर्त्यांच्या उत्साहात सहभाग नोंदवला.
हेही वाचा: Malegaon Election Result 2026 : मालेगाव महापालिकेच्या निकालामुळे राजकारणात मोठी उलथापालथ; भाजपाचा दारुण पराभव, विजयी उमेदवार जाहीर
या विजयाचे सर्वात भावूक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे पडसाद तेव्हा उमटले, जेव्हा यशवंत किल्लेदार यांनी विजयानंतर थेट उद्धव ठाकरे यांना फोन केला. "दादर आम्ही सांभाळलाय, मी तुमचं हृदय सांभाळलंय" असे शब्द किल्लेदारांनी उच्चारताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यावर उद्धव ठाकरेंनीही मोठ्या मनाने दाद देत म्हटले की, "शिवसेना भवन आता तुझ्या प्रभागात आहे, ते तुलाच सांभाळायचं आहे." हा संवाद म्हणजे मुंबईच्या राजकारणातील मराठी ओलाव्याची साक्ष ठरला.
जरी ठाकरे बंधू सत्ता वाचवू शकले नसले, तरी दादर आणि मराठीबहुल पट्ट्यात त्यांना मिळालेले मतदान हे अजूनही 'ठाकरे' नावाचा करिष्मा कायम असल्याचे दर्शवते. मात्र, सत्तेची चावी आता महायुतीच्या हाती गेल्याने मुंबई पालिकेचा कारभार आता नव्या दिशेने चालणार हे निश्चित झाले आहे.
आता मुंबईचा पुढचा महापौर कोणाचा होणार आणि महायुती मुंबईच्या विकासाचा 'रोडमॅप' कसा आखणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. विशेषतः दादरमध्ये यशवंत किल्लेदार यांच्या रूपाने मनसेने जो गड राखला आहे, तिथे आता शिवसेना भवन आणि मराठी अस्मितेची जपणूक कशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुंबईने दिलेला हा कौल राज्याच्या आगामी राजकारणाची नांदी मानला जात आहे.
हेही वाचा: Eknath Shinde On BMC Result : 'मुंबईचा महापौर महायुतीचाच...'; महापालिकेच्या निकालावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?