Tuesday, February 17, 2026 07:48:16 AM

Children Missing Case: मुंबई हादरली! गेल्या 36 तासांत 12 मुले बेपत्ता; पालकांमध्ये भीती

मुंबई पोलिसांनी सर्व बेपत्ता मुलांचा सुरक्षित शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले आहे.

children missing case मुंबई हादरली गेल्या 36 तासांत 12 मुले बेपत्ता पालकांमध्ये भीती

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांनी गंभीर आणि चिंताजनक स्वरूप धारण केले आहे. अवघ्या गेल्या 36 तासांत शहरातील सात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून, यामध्ये आठ मुलींचा समावेश आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बालहक्क कार्यकर्ते आणि यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

पालक आणि नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारींनुसार, 12 अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS, Bharatiya Nyaya Sanhita) कलम 137(2) अंतर्गत अपहरणाच्या संशयावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमुळे शहरात संघटित बालतस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता अधिक बळावली आहे, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबई पोलिसांनी सर्व बेपत्ता मुलांचा सुरक्षित शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अशा घटनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पोलिस यंत्रणेसह बालसुरक्षा क्षेत्रातही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, काही प्रकरणांमागे मानवी तस्करी (Human Trafficking) हे प्रमुख कारण असू शकते. जरी काही घटना घरातून पळून जाणे किंवा कौटुंबिक वादांशी संबंधित असू शकतात, तरी मुलींचे प्रमाण जास्त असणे आणि सातत्याने वाढणारी संख्या हे संघटित टोळ्यांच्या सहभागाकडे निर्देश करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा: Mumbai University Exams : निवडणुकांचा फटका; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

पोलिसांनी सांगितले की, महानगरांमध्ये झोपडपट्ट्या, गर्दीची बाजारपेठा, रेल्वे स्थानके आणि बस डेपो ही ठिकाणे मुलांसाठी अधिक असुरक्षित ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अलर्ट मोडमध्ये जात सीसीटीव्ही निरीक्षण, पायी गस्त आणि तांत्रिक देखरेख मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. काही मुले लवकर सापडली असली, तरी उर्वरित प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे.

पोलीस ठाणेनिहाय प्रकरणे

पोलीस नोंदींनुसार, शिवाजीनगर येथून चार, साकीनाका येथून दोन, अँटॉप हिल येथून दोन, तर ओशिवरा, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपर येथून प्रत्येकी एक अशा एकूण 12 मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत कोणत्याही कुटुंबाला खंडणीचा (Ransom) फोन आलेला नाही, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

शहरभर शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून, बेपत्ता मुलांचे फोटो गर्दीच्या बाजारपेठा, सार्वजनिक उद्याने, रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये, बालगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार जून ते डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण 145 मुले बेपत्ता झाली होती, यापैकी 93 मुली होत्या. 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यानच 82 प्रकरणे नोंदली गेली होती. अनेक प्रकरणांत मुले शोधून सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आली असली, तरी वाढती संख्या ही शहरासाठी गंभीर इशारा मानली जात आहे.

हेही वाचा: Liquor Smuggling Case: रेल्वेतून दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मोठ्या प्रमाणात साठा आणि रोख रक्कम पोलिसांकडून जप्त


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या