Friday, March 13, 2026 10:58:30 PM

Mumbai Metro Accident : मुलुंड येथे मेट्रो 4 प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, चार जण जखमी, एक गंभीर

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या मानकांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

mumbai metro accident  मुलुंड येथे मेट्रो 4 प्रकल्पाचा स्लॅब कोसळला एकाचा मृत्यू चार जण जखमी एक गंभीर

मुंबई: वर्दळीचा एलबीएस मार्ग आणि अचानक झालेला तो कानठळ्या बसवणारा आवाज... मुंबईतील मुलुंड पश्चिम भागात शनिवारची दुपार, मेट्रोच्या बांधकामादरम्यान घडलेल्या एका थरारक अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मेट्रो स्टेशनच्या पिलरमधील सिमेंटचा एक अवाढव्य भाग थेट खाली जाणाऱ्या रिक्षावर कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून, एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  'विकासाच्या वेगात' प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास मुलुंड पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री (LBS Marg) रोडवरील जॉनसन अँड जॉनसन कंपनीजवळ हा थरार घडला. मेट्रो 4 (ग्रीन लाईन) प्रकल्पांतर्गत एलबीएस स्थानकाचे बांधकाम सुरू असताना, उंचावरून सिमेंटच्या खांबाचा एक मोठा तुकडा अनपेक्षितपणे कोसळला. दुर्दैवाने, त्याच वेळी खालून जात असलेली एक रिक्षा या ढिगाऱ्याखाली आली. हा आघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी दिली आहे. 

घटनेची भीषणता पाहून परिसरातील नागरिक तात्काळ मदतीला धावले. रिक्षा सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे त्यातील एक प्रवासी आतच अडकून पडला होता. 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' याचा प्रत्यय तेव्हा आला, जेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी, पोलीस आणि मेट्रो कर्मचाऱ्यांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य राबवले. अवजड स्लॅब बाजूला सारून जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि 108 रुग्णवाहिकेमार्फत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: Glorious History of Shivaji Maharaj : शिवरायांच्या पराक्रमाला पॅरिसमध्ये मानाचा मुजरा! महाराष्ट्राच्या 12 किल्ल्यांना UNESCOचे जागतिक वारसा प्रमाणपत्र

हा अपघात मुंबई मेट्रोच्या 32.32 किलोमीटर लांबीच्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली या मार्गिकेवर झाला आहे. हा एलिवेटेड कॉरिडोअर मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ 60 ते 75 मिनिटांवरून थेट 30 ते 40 मिनिटांवर आणण्यासाठी आखला गेला आहे. मुंबई लोकलवरील ताण कमी करण्याचे स्वप्न दाखवणारा हा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे, मात्र अशा अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, ज्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मेट्रो प्रशासनाकडून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असले, तरी "प्रशासकीय निष्काळजीपणामुळे सामान्य माणसाचा बळी का?" असा संतप्त सवाल आता स्थानिक रहिवाशांकडून विचारला जात आहे.

मेट्रोच्या कामामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार असला, तरी सुरक्षेच्या मानकांकडे होणारे दुर्लक्ष भविष्यात अधिक महाग पडू शकते. या घटनेमुळे मेट्रो प्राधिकरणाने बांधकामाच्या ठिकाणी अतिरिक्त खबरदारी घेण्याची नितांत गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: RBI Fines Bank: आरबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये; तीन बँका आणि दोन फायनान्स कंपन्यांना करोडोंचा दंड; वाचा काय आहे कारण


सम्बन्धित सामग्री