दिवाळीच्या आनंदात फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळलं असलं, तरी त्याचा परिणाम मुंबईच्या हवेवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांत शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील फटाके फोडण्यामुळे हवेतील प्रदूषणाचा स्तर झपाट्याने वाढला आहे. सकाळच्या वेळी रस्त्यांवर, मैदानात आणि गल्लीबोळात फटाक्यांचा कचरा विखुरलेला दिसत आहे, तर हवेत धुरकटपणा निर्माण झाला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबईतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले, ज्याचा थेट परिणाम शहराच्या हवेच्या निर्देशांकावर (AQI) झाला. मंगळवारी सकाळी मुंबईचा हवा निर्देशांक 211 इतका नोंदवला गेला, जो ‘खराब’ या श्रेणीत मोडतो. फटाक्यांच्या धुरामुळे हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले असून, बांद्रा, गोरेगाव, कुलाबा आणि मुलुंड हे सर्वाधिक प्रदूषित भाग ठरले आहेत.
हेही वाचा: Imtiaz Jaleel: शनिवारवाड्यातील नमाज पठणावरुन तापलं राजकारण; इम्तियाज जलील यांचा भाजपावर जोरदार हल्ला
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, फटाक्यांमधून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडसारख्या वायूंच्या मिश्रणामुळे श्वसनासंबंधी आजार असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना उगाच बाहेर जाणं टाळावं आणि मास्कचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) प्रदूषणाच्या पातळीवर बारीक लक्ष ठेवले असून, पुढील काही दिवस वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने प्रदूषणाची पातळी आणखी वाढू शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणाऱ्या ऍप्सनुसार दिवाळीच्या दिवशी मुंबईतील हवा सकाळी ‘मध्यम’ श्रेणीत होती, मात्र सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ती ‘खराब’ ते ‘अतिखराब’ श्रेणीत पोहोचली. सुतळी बॉम्ब, रॉकेट्स आणि रंगीबेरंगी आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या दाट धुरामुळे शहर धूसर दिसत होतं. यामुळे पर्यावरण प्रेमी व ज्येष्ठ नागरीक चिंता व्यक्त करत होते.
या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नागरिकांना “सण साजरा करा, पण पर्यावरणाची काळजीही घ्या” असं आवाहन केलं आहे.
हेही वाचा: Share Market Today News : शेअर मार्केट आज सुरू राहणार की बंद ? मोठी अपडेट समोर