मुंबई: राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवत, 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू होणार आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यामुळे शालेय अभ्यासक्रम, भाषा शिक्षण आणि शैक्षणिक टप्प्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.
आता या तीनही भाषा असणार सक्तीच्या:
केंद्र सरकारने तयार केलेल्या नव्या धोरणानुसार, इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शिकवण्यात येणार आहेत, तसेच या तीनही भाषा सक्तीच्या असणार आहेत. 'या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासास चालना मिळेल,' अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
शालेय अभ्यासक्रमात होणार मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल:
नवीन शिक्षण धोरणाने केवळ भाषेचीच नव्हे तर संपूर्ण अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पारंपरिक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या संज्ञांऐवजी आता पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर असे महत्त्वाचे टप्पे असतील.
हेही वाचा: Laxman Hake: धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं; ओबीसी नेत्याची टीका
अशाप्रकारे, 2025-26 पासून राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होणार आहे:
2025-26: इयत्ता पहिलीमध्ये NEP ची अंमलबजावणी सुरू होईल,
2026-27: इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीमध्ये NEP लागू होईल,
2027-28: इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीमध्ये NEP लागू करण्यात येईल,
2028-29: अखेर इयत्ता आठवी, दहावी आणि बारावीमध्ये NEP चे पूर्णपणे पालन करण्यात येणार आहे.