नवी दिल्ली: महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्यानंतर देशभरात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. महिला आरक्षण विधेयक संसदेत सादर केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
नवनीत राणा या या मुद्द्यावर बोलताना भावूक झालेल्या दिसल्या. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर करून देशातील महिलांविषयी आदर व्यक्त केला. यासाठी देशातील सर्व महिला त्यांच्या ऋणी राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: Sanjay Raut: ‘महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची मोडतोड करण्याचा डाव’; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल
त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत म्हटले की, विरोधी पक्षांनी केवळ त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला. महिलांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न बाजूला ठेवून त्यांनी राजकारण केले आणि त्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही, असा आरोप त्यांनी केला.
“या देशातील महिला विरोधकांना कधीच माफ करणार नाहीत,” असे ठाम शब्दांत नवनीत राणा यांनी म्हटले. महिला आरक्षणाचा मुद्दा हा केवळ राजकारणाचा विषय नसून महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या हक्कांचा विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्यानंतर देशभरात राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांचे नेते आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. आगामी काळात हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Eknath Shinde: ‘महिला आरक्षण विधेयक फेटाळणे दुर्दैवी’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर साधला निशाणा