राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन आजही अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. सुरुवातीला हा अपघात दुर्दैवी घटना म्हणून पाहिला गेला, मात्र जसजशी माहिती समोर येत आहे, तसतसे या अपघातामागे निष्काळजीपणा, यंत्रणांचा हलगर्जीपणा की जाणूनबुजून केलेला घातपात, याबाबत संशय अधिक गडद होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत टप्प्याटप्प्याने, वेळेनुसार आणि कागदपत्रांच्या आधारे अनेक गंभीर बाबी समोर आणल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत अपघात प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा- BMC Mayor Action Plan: शाळांमध्ये संविधानाची मूल्ये आणि टँकर मुक्त मुंबई; मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे यांचे 'मिशन व्हिजन' जाहीर
यावेळी अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की,"आमदार श्री रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना नुकतच याबाबत मी स्वत:भेटून पत्र दिले आहे. माननीय मुख्यमंत्री त्यांच्या अत्यंत जवळच्या व तितक्याच विश्वासु मित्राच्या घातपाती मृत्यु व त्यामागील षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत याबद्दल माझ्या मनात दुमत नाही."