जळगाव: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. धरणगाव तालुक्यातील पिंपरी गावाजवळ मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी केलं. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. “शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे” अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी होती.
हेही वाचा:'पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलता'; उद्धव ठाकरेंवर टोमण्यांचा वर्षाव
धरणगाव पिंपरी गावा जवळ आंदोलन करताना, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली. आंदोलकांनी “सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे”, 'कर्जमाफीचा नारा हवेत गेला', अशा घोषणा देत संताप व्यक्त केला.
हेही वाचा:कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा
सरकारकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.