Ajit Pawar Plane Crash New Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे गूढ आता अधिकच गडद झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारामती विमानतळावरील लँडिंगचा एक अतिशय स्पष्ट आणि धक्कादायक व्हिडिओ सादर केला आहे. या व्हिडीओमुळे हा केवळ तांत्रिक अपघात होता की एखादा मोठा घातपात, या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
धावपट्टीवरील 'ते' शेवटचे 5 सेकंद; व्हिडिओतून समोर आले भीषण वास्तव
रोहित पवार यांनी शेअर केलेल्या नव्या फुटेजमध्ये बारामती विमानतळाची धावपट्टी स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओतील दृश्यांनुसार, अजित पवारांचे विमान लँडिंगसाठी धावपट्टीच्या अगदी जवळ आले होते. मात्र, शेवटच्या 5 सेकंदात विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि धावपट्टीवर उतरण्याऐवजी बाजूला कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचा अत्यंत भीषण स्फोट झाला आणि काही क्षणांतच आगीच्या गोळ्याने विमानाला वेढले. विमान लँड होण्याऐवजी थेट जमिनीवर आदळले, याचे दृश्य या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.
हेही वाचा - Rohit Pawar on Ajit Pawar Death : विदर्भातील 'तो' नेता अन् 'ती' फाईल...; रोहित पवारांचा पुन्हा खळबळजनक खुलासा
पाच स्फोटक प्रश्न; तांत्रिक दोष की मोठा कट?
हा व्हिडिओ सादर करताना रोहित पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारला काही टोकदार प्रश्न विचारून संशयाची सुई फिरवली आहे. लँडिंगच्या वेळी विमान अचानक एका बाजूला का झुकले? विमानाचे स्थान दर्शवणारे 'ट्रान्सपॉन्डर' नेमके शेवटच्या क्षणी का बंद झाले? आणि विमान कोसळताच इतका तीव्र स्फोट होण्यामागे इंधनाव्यतिरिक्त अन्य काही स्फोटक द्रव्ये होती का? असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, अजितदादा गेल्या काही दिवसांपासून स्वतःच्या बाटलीतील पाणी पिण्याइतकी खबरदारी घेत असतानाच ही दुर्घटना घडणे हा केवळ योगायोग आहे की कट, असा सवालही त्यांनी केला आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी; राजकारण तापणार
"हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा केवळ अपघात वाटत नाही," असे स्पष्ट मत रोहित पवारांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत, बारामतीसारख्या सुरक्षित विमानतळावर अशा प्रकारची सुरक्षा त्रुटी कशी राहू शकते, याकडे लक्ष वेधले आहे. या नव्या पुराव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, तपासाची दिशा आता कोणत्या बाजूने वळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.