Saturday, March 07, 2026 02:10:47 AM

Rajya Sabha Election: 'आमचं संख्याबळ जास्त, मग जागाही...'; राज्यसभेच्या जागेसासाठी आदित्य ठाकरेंचा दावा

शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'संख्याबळा'चा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेचा (ठाकरे गट) दावा अधिकृतपणे अधोरेखित केला आहे.

rajya sabha election आमचं संख्याबळ जास्त मग जागाही राज्यसभेच्या जागेसासाठी आदित्य ठाकरेंचा दावा

Rajya Sabha Election: राज्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच, महाविकास आघाडीत (मविआ) उमेदवारीवरून पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'संख्याबळा'चा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेचा (ठाकरे गट) दावा अधिकृतपणे अधोरेखित केला आहे. यामुळे आघाडीत नवा वाद उफाळणार की चर्चेतून मार्ग निघणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

आदित्य ठाकरेंची स्पष्ट भूमिका: संख्याबळ आणि रोटेशनचा आधार
मुंबईतील शिवाजी पार्क येथील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या सुरू असलेल्या उमेदवारांच्या चर्चा केवळ अफवा असून अद्याप कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उमेदवारी ठरवताना आमदारांच्या संख्याबळाचा विचार होणे आवश्यक असल्याचे सांगत, त्यांनी रोटेशन पद्धतीनुसार यावेळी शिवसेनेची संधी असल्याचे अधोरेखित केले. 

जागेचे गणित आणि पक्षांमधील रस्सीखेच
राज्यातील सध्याचे राजकीय समीकरण पाहता, महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 1 जागा येण्याची चिन्हे आहेत. या एका जागेसाठी आता मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.  महाविकास आघाडीतील (MVA) सध्याच्या राजकीय गणितानुसार, राज्यसभेच्या एका जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये शिवसेना (UBT) कडे सर्वाधिक म्हणजे 20 आमदारांचे संख्याबळ असल्याने त्यांनी या जागेवर आपला दावा ठोकला आहे. दुसरीकडे, काँग्रेसकडे 14 आमदार असून त्यांच्यातील एका गटाचा शरद पवारांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे समजते. दरम्यान, 10 आमदारांचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षातर्फे स्वतः शरद पवार निवडणूक लढवतील, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा - Sunetra Pawar : शब्द जड झाले, कंठ दाटून आला; उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं शिवनेरीवर पहिलंच भाषण

शरद पवारांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह
यापूर्वी शरद पवार यांचे नाव आघाडीत चर्चेत होते, मात्र काँग्रेसमधील एका गटाचा विरोध आणि आता आदित्य ठाकरेंनी दिलेला 'संख्याबळा'चा दाखला यामुळे पेच वाढला आहे. जर शिवसेनेने ही जागा स्वतःकडे खेचून घेतली, तर शरद पवारांच्या उमेदवारीचे काय होणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. थोडक्यात, या जागेवरून मविआमध्ये समन्वय साधला जाणार की अंतर्गत धुसफूस वाढणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.


सम्बन्धित सामग्री