बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक महत्त्वाचा आणि चर्चेचा निर्णय समोर आला आहे. वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना लक्षात घेऊन परळी नगरपरिषदेने दर सोमवारी शहरात मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परळी शहराची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. परळी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह देशभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे धार्मिक वातावरण आणि भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्यांनी एकमताने या ठरावाला मंजुरी दिली. त्यामुळे आता प्रत्येक सोमवारी शहरातील मांसविक्री दुकाने बंद राहणार आहेत. पालिकेच्या या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. भाविक आणि स्थानिक नागरिकांनी हा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. धार्मिक नगरीची ओळख जपण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचेही सांगितले जात आहे.
अशा प्रकारचा निर्णय घेणारी परळी ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इतर धार्मिक स्थळांच्या शहरांमध्येही अशा प्रकारच्या निर्णयांबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सोमवारी शहरात अधिक शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परळीतील वैद्यनाथ मंदिर हे श्रद्धास्थान असल्याने भाविकांच्या भावना जपण्याचा प्रयत्न म्हणून पालिकेने हे पाऊल उचलले आहे.