Atal Setu Toll-Free: मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि स्वस्त करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात लांब सागरी मार्ग असलेल्या 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू'वरील टोलमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा कालावधी आता पुढील एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली.
पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन: ई-वाहने टोलमुक्त
या निर्णयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना (EV) मोठे प्रोत्साहन दिले आहे. नव्या अधिसूचनेनुसार, आता अटल सेतूवरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक कार आणि बसेसना कोणत्याही प्रकारचा टोल भरावा लागणार नाही. ई-वाहनधारकांसाठी हा प्रवास आता पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.
हेही वाचा- BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत अमराठी नगरसेवकांची फौज! तब्बल 76 विजयी चेहऱ्यांमुळे महापौरपदाच्या गणितात नवा ट्वीस्ट
टोल सवलतीची मुदतवाढ
दरम्यान, 4 जानेवारी 2024 रोजी सरकारने पथकरात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. ही सवलत आता 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहील. यामुळे सामान्य वाहनधारकांच्या खिशावर पडणारा भार हलका होणार असून मुंबई-नवी मुंबई कनेक्टिव्हिटीला अधिक वेग मिळेल.
हेही वाचा- Nashik Mayor Reservation : नाशिकच्या महापौरपदी कोण? आरक्षण सोडतीच्या तारखेची मोठी अपडेट समोर, जाणून घ्या
सुधारित टोल दर (एकेरी प्रवास)
अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या विविध वाहनांसाठी एकेरी प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार कार, जीप, व्हॅन आणि इतर सर्व हलक्या वाहनांना आता 250 रुपये टोल भरावा लागणार आहे. मिनी बस आणि हलक्या मालवाहू वाहनांसाठी हा दर 400 रुपये इतका असेल. मोठ्या वाहनांच्या श्रेणीमध्ये, दोन एक्सल असलेल्या ट्रक किंवा बसला 830 रुपये, तर तीन एक्सल असलेल्या व्यावसायिक वाहनांना 905 रुपये टोल द्यावा लागेल. याशिवाय, अवजड बांधकाम यंत्रसामग्री किंवा मल्टि-एक्सल वाहनांसाठी 1300 रुपये आणि सात किंवा त्यापेक्षा जास्त एक्सल असलेल्या अति अवजड वाहनांसाठी 1500 रुपये टोल दर निश्चित करण्यात आला आहे.