मुंबई: राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातानंतर राजकीय वर्तुळात अद्यापही संशयाचे वातावरण कायम आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी आता या प्रकरणात मोठी घोषणा केली आहे. 14 मे 2026 रोजी, छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त “जस्टिस फॉर अजितदादा” या अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बारामती पोटनिवडणुकीमुळे सध्या यात्रेची सविस्तर रूपरेषा जाहीर करण्यात आलेली नसली, तरी लवकरच याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मिटकरी म्हणाले.
हेही वाचा: US Sanctions Russian Oil : भारताच्या स्वस्त तेल खरेदीला ब्रेक? रशिया-इराणकडून आयातीसाठी अमेरिकेची सवलत संपली; बसणार आर्थिक फटका
ते म्हणाले की, ही यात्रा सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन केली जाणार असून, जिथे रात्र होईल तिथे मुक्काम करून ग्रामसभांमध्ये ठराव मांडले जातील. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
दादा विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे?, ब्लॅक बॉक्सचा डेटा का समोर आलेला नाही, विमानात नेमके किती लोक होते?, तसेच कॅप्टन सुमित कपूर प्रत्यक्षात विमान चालवत होता का?, असे प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत.
या आधीही आमदार रोहित पवार आणि इतर नेत्यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली होती. आता अमोल मिटकरी यांच्या यात्रेमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: TCS Company Case: नाशिककरांचा संताप! टीसीएस लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाविरोधात सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा