Ajit Pawar Accident Case: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल केली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील न्यायिक आयोगामार्फत करण्याची मागणी केली आहे.
नेमकी मागणी काय?
केतन तिरोडकर यांनी आपल्या याचिकेत या अपघाताच्या सखोल तपासासाठी एका विशेष आयोगाची स्थापना करण्याची विनंती केली आहे. या आयोगामध्ये तांत्रिक बाबींच्या तपासासाठी DGCA चे निवृत्त संचालक आणि एअर इंडियासारख्या नामांकित कंपनीचे मुख्य देखभाल अभियंता या तज्ज्ञांचा समावेश असावा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, सीआयडी (CID) मार्फत अपघाती मृत्यूची नोंद करून स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत आणि या आयोगाने 90 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करावा, अशी मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
रोहित पवार यांना केले प्रतिवादी
या याचिकेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आमदार रोहित पवार यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. रोहित पवार यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित जी काही माहिती असेल, ती त्यांनी न्यायिक आयोगासमोर सादर करावी, असे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती तिरोडकर यांनी केली आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : 'विमान कंपनीला वाचवण्याचा घाट...'; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप; लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट
अपघाताची पार्श्वभूमी
28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाड हे यामागचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) संबंधित विमान कंपनीवर सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत त्यांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता उच्च न्यायालय या याचिकेवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.