मुंबई: राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारीवरून नाराजीचे सूर उमटत आहेत. अशातच आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. त्यांनी दावा केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली होती.
रवी राणा म्हणाले की, “मला एकनाथ शिंदे यांनी पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र मी ती ऑफर स्पष्टपणे नाकारली.” त्यांनी पुढे सांगितले की, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत आणि राजकारणात शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहोत. “माझी निष्ठा फडणवीसांसोबतच आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
हेही वाचा: West Bengal Election 2026: 'जिवाची बाजी लावून लढू', ममतादीदींचा संताप; EVM घोटाळ्याचा संशय व्यक्त करत दिला थेट इशारा
दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशानंतर राणा-कडू यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “बच्चू कडूंना माझ्या शुभेच्छा आहेत. ते आधीही शिवसेनेत होते आणि आता पुन्हा शिवसेनेत आले आहेत,” असे ते म्हणाले.
“महायुतीचा धर्म आपण सर्वांनी पाळला पाहिजे. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे,” असेही रवी राणा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचे सूचित केले.
एकूणच, रवी राणा यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राज्यातील राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. शिंदे गट, बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील समीकरणे पुढे कशी तयार होतात, तसेच इतर नेत्यांच्या यावर काय प्रतिक्रिया काय येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा: Weather Update : महिन्याच्या सुरवातीलाच राज्यावर दुहेरी संकट! एकीकडे उन्हाने होरपळून काढलं, तर ‘या’ जिल्ह्यांना अवकाळीचा अलर्ट जारी