मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास 70 हजारांहून अधिक पदांची भरती होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20 हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.
हेही वाचा : HSC Board Exam 2026 : उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची कसोटी, बोर्डाकडून नियमावलीत मोठा बदल
राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. संपूर्ण भरती प्रक्रिया प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येत प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.