एकीकडे राज्यभरात ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज, शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत आहे. अनेक नेत्यांनी आपापल्या मतदानकेंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे पवार कुटुंबीयांनी सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी काटेवाडी येथे येऊन शांततेत मतदान केले. राजकीय आणि वैयक्तिक दुःखाच्या पार्श्वभूमीवरही पवार कुटुंबीयांनी मतदान करून लोकशाहीप्रती त्यांची बांधिलकी दाखवली. अशातच आमदार रोहित पवार यांनी पिंपळी गावात मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे गौप्यस्फोट केले.
हेही वाचा- Mumbai Mayor : मोठी बातमी! भाजपचा महापौर तर शिंदेसेनेने बजावली महत्त्वाची भूमिका
रोहित पवार म्हणाले की, "दादांचे जे स्वप्न होते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दादांचे जे कार्यकर्ते आहेत ते जास्तीत जास्त निवडून यावेत, ही त्यावेळीची त्यांची इच्छा आणि स्वप्न आज आपल्याला म्हणावे लागेल की, ते त्यांचे अंतिम स्वप्न होतं. आज मी माझ्या परिवारासोबत येऊन मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. मला विश्वास आहे की, दादांचे जे स्वप्न होते की, जिल्हा परिषदेला त्यांचे कार्यकर्ते जास्त निवडून येतील ते स्वप्न मतदार आणि कार्येकर्ते पूर्ण करतील. विमान अपघाताबाबत ज्या शंका आम्हाला आहेत त्या शंका आम्ही 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत मांडणार आहे. 12 तारखेला विलिनिकरणाबद्दल काय घडलं? दादांसोबत काय चर्चा झाल्या त्यांची काय इच्छा होती हे मी 12 तारखेला मुंबईला पत्रकार परिषद घेत लोकांसमोर मांडणार आहे. हे सगळ मी 12 तारखेलाच का सांगणार आहे, याच कारण देखील मी तेव्हाच सांगेन..."