महाराष्ट्र: महाराष्ट्रात हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'हिंदीची सक्ती ही महाराष्ट्रातील मराठी अस्तित्व नष्ट करण्याचा कट आहे,' असं ते म्हणाले. त्यांनी विचारलं की, हिंदीची सक्ती गुजरातमध्ये का नाही? पंतप्रधान मोदींनी गुजराती जनतेला विचारलं होतं का, की तुम्ही हिंदीची सक्ती सहन कराल?
हेही वाचा: मिरज शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणानंतर मोठा निर्णय
राऊत यांनी स्पष्ट केलं की, फडणवीस महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पाडत असून आता हिंदीची सक्ती लादत आहेत. मुंबईसारख्या शहरात मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत. मराठी भाषा आणि संस्कृतीवर हे आघात असल्याचे ते म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर मराठी लेखक, कवी, अभिनेते यांनी ठाम भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी हेमंत दिवटे यांनी राज्य सरकारचा पुरस्कार हिंदी सक्तीच्या निषेधार्थ परत करण्याची घोषणा केली आहे. संदीप चौगुले यांच्यासह अनेकांनी सरकारविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. शिवसेनेकडून या सर्वांचा अभिनंदन करण्यात आला आहे.