मुंबई : नुकतीच राज्याच्या विधिमंडळातील बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील सात जागांसाठी राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 16 मार्च रोजी होणाऱ्या या मतदानातून महाराष्ट्राचे दिल्लीतील प्रतिनिधी कोण असतील, याचा निर्णय होणार आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असलेल्या दिग्गजांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे नारायण राणे आणि भागवत कराड, शिवसेनेच्या (उबाठा) प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) फौजिया खान यांचा समावेश आहे. या सात जागांसाठी निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. तर 26 फेब्रुवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. तसेच 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 9 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 16 मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत मतदान पार पडेल आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
हेही वाचा : Ajit Pawar AI Video : अजित पवार यांच्यावरील 'त्या' AI व्हिडीओवर आक्षेप; राष्ट्रवादीकडून कारवाईचा इशारा, पत्रक जारी
परिणामी, राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यसभेवर आयारामाना संधी न देता पक्षातील निष्ठावंताना संधी द्या, असे प्रयत्न भाजपच्या काही निष्ठावंतांकडून होताना दिसत आहेत. मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी दिली जात आहे. त्यामुळे आता तरी निष्ठावंतांचा विचार व्हायला हवा, असे भाजपच्या एका गटाचे मत आहे. भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा होत असून यामध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांची नावे समोर येत आहेत.