सोलापूर: सोलापूरच्या विकासाच्या क्षितिजावर आज यशाचा एक नवा टप्पा अधोरेखित झाला आहे. सोलापूर - मुंबई विमानसेवेला प्रवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर, आता सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 19 जानेवारीपासून सोलापूर - इंदूर या नवीन विमानसेवेचा ‘श्रीगणेशा’ झाला असून, यामुळे सोलापूर आता मध्य प्रदेशातील इंदूर या महत्त्वाच्या शहराशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. स्टार एअर या कंपनीने सोलापूर-मुंबई विमानसेवेचा विस्तार इंदूरपर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वेळापत्रक: प्रवासाची नवी गणितं
सोलापूरच्या प्रवाशांना या नव्या विमानसेवेमुळे वेगवान प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे. या विमानाचे वेळापत्रक अतिशय सोयीस्कर ठेवण्यात आले आहे. सोलापूर विमानतळावरून दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी विमान उड्डाण करेल आणि 3 वाजून 55 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. मुंबईच्या धावपळीत साधारण 45 मिनिटांचा विसावा (थांबा) घेतल्यानंतर, हे विमान सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी इंदूरच्या दिशेने झेपावेल. सायंकाळी साडे पाच वाजता हे विमान इंदूरच्या विमानतळावर लँडिंग करेल. म्हणजेच, अवघ्या काही तासांत ‘सोलापुरी चादर’ आता ‘इंदुरी पोह्यांचा’ आस्वाद नागरिक घेऊ शकणार आहेत.
हेही वाचा: Sensex Falls Reasons: शेअर बाजारात हाहाकार; गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी एका झटक्यात स्वाहा; 'या' कारणांनी मार्केट कोसळलं
आठवड्यातून तीन दिवस ‘हवाई वारी’
सध्या ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध असणार आहे. सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी सोलापूर ते इंदूर प्रवास करता येईल. सोलापूर मुंबई विमानसेवेला मिळत असलेली गर्दी पाहता, स्टार एअरने हा विस्तार केला असून या मार्गासाठी प्रति प्रवासी 4,100 रुपये इतका तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात ‘गगनभरारी’ घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
व्यापार आणि पर्यटनाला ‘बळ’
आजच्या व्यापारी जगातही वेळ वाचवणे हीच मोठी कमाई ठरते. सोलापूरमधील कापड उद्योग, कारखानदार आणि व्यापाऱ्यांसाठी इंदूर हे महत्त्वाचे केंद्र आहे. या विमानसेवेमुळे दोन्ही शहरांमधील व्यावसायिक संबंध अधिक घट्ट होतील. तसेच, ज्यांना महाकालेश्वर किंवा ओंकारेश्वर सारख्या तीर्थस्थळांना भेट द्यायची आहे, त्यांच्यासाठीही हा प्रवास सुखकर ठरणार आहे.
विकासाच्या प्रवासाला ‘गती’
सोलापूरने गेल्या काही महिन्यांत हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा केली आहे. मुंबईनंतर आता इंदूरशी जोडले गेल्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाला मोठी गती मिळणार आहे. प्रवाशांचा ओघ वाढल्यास भविष्यात ही सेवा दररोज सुरू होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकंदरीत, सोलापूरच्या प्रगतीचे विमान आता खऱ्या अर्थाने नव्या उंचीवर झेपावू लागले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
हेही वाचा: RBI New Rules 2026: क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाचे! RBI चे तीन नवीन नियम लागू; एक चूक अन् स्कोअर...