काटेवाडीत अजित पवारांना शासकीय मानवंदना देण्यात आली असून, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला आहे. सकाळपासूनच काटेवाडी परिसरात नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव सध्या काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून, थोड्याच वेळात ते विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नेण्यात येणार आहे. याच ठिकाणी आज त्यांच्या अंत्यसंस्कारांना सुरुवात होणार आहे.
अजित पवारांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस दलाकडून सशस्त्र सलामी देण्यात आली. अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर काटेवाडीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील काटेवाडीतील निवासस्थानी पोहोचले असून कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे चार सभांसाठी निघालेलं विमान सकाळी ८.४५ च्या सुमारास रनवे जवळील शेतात कोसळलं. अपघातानंतर विमानाला आग लागून मोठे स्फोट झाले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पायलट, को-पायलट, फ्लाइट अटेंडंट आणि सुरक्षा रक्षक अशा पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून आज बारामतीत भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.