आता तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी 5:00 च्या सुमारास एक भीषण अपघात झाला होता. प्रोपिलिन हा अत्यंत ज्वलनशील वायू वाहून नेणारा एक भरधाव टँकर उतारावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाला आणि त्यातून मोठी गॅस गळती सुरू झाली होती. या एका घटनेने राज्याची ही जीवनवाहिनी तब्बल 27 तासांहून अधिक काळ विसकळीत झाली असून, हजारो प्रवाशांचे आयुष्य रस्त्यावरच थांबले होते. त्यानंतर तब्बल 32 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पडलेला गॅस टँकर हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. यावेळी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलीस यंत्रणा, एनडीआरएफची टीम, फायर ब्रिगेडचे जवान, ओएनजीसीमधील तज्ज्ञ पथक, सीआयएसएफचे जवान तसेच स्थानिक स्वयंसेवक शर्थीचे प्रयत्न करत होते. दरम्यान गॅस टँकर हटवताना कोणाताही हलगर्जीपणा अंगाशी येऊ नये यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता. सर्व यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संभाव्य मोठा धोका टळला.
हेही वाचा- Mumbai Pune Expressway Traffic Jam : भीषण अपघातानंतर गॅस गळतीमुळे महामार्ग ठप्प; रुग्ण आणि प्रवाशांचे अतोनात हाल, विमानेही चुकली!
नेमकं काय घडलं होत?
मुंबई–पुणे महामार्गावर आडोशी बोगदाजवळ वायू वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाल्यामुळे या अपघातानंतर मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी जवळपास 27 तासांपासून होती ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या गंभीर परिस्थितीचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर झाला. तसेच पुण्यातील स्वारगेट येथील बस डेपोमधून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बस सेवा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला असून स्वारगेट परिसरात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. अपघातग्रस्त टँकर हटवण्याचे आणि मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कधी पूर्णपणे पूर्ववत होईल याबाबत सर्वांना काळजी लागली होती. या अपघातानंतर प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि प्रवासापूर्वी वाहतूक स्थितीची माहिती घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.