JM Special Report: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली दिसत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांकडे जाण्याची शक्यता अधिक बळावली असून, त्यामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात एक नवं पर्व सुरू होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी पक्षाला महिला नेतृत्व कधीच मान्य नव्हतं, असं नाही. मात्र पक्षाची सूत्रे थेट एका महिलेकडे जाण्याचा प्रश्न याआधी कधीच निर्णायक टप्प्यावर पोहोचला नव्हता.
एकेकाळी राष्ट्रवादीची धुरा अजित पवारांकडे जाणार की सुप्रिया सुळे यांच्याकडे, हा प्रश्न बराच काळ अनुत्तरित राहिला होता. त्यानंतर पक्षात फूट पडली आणि अर्ध्यापेक्षा अधिक आमदार व नेते अजित पवारांसोबत गेले. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेली. आता अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवारांकडे जाण्याची चर्चा सुरू असून, ती प्रत्यक्षात आली तर तो राष्ट्रवादीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरेल.
सुनेत्रा पवार यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्यास त्यांच्या समोर अनेक मोठी आव्हानं असतील. एकाच वेळी पक्षाची धुरा आणि राज्यातील जबाबदाऱ्या सांभाळणं सहजसोपं नसेल. मात्र पुढील तीन वर्षे राज्यात कोणतीही मोठी निवडणूक नसणं, ही बाब त्यांच्यासाठी जमेची ठरू शकते. या काळात त्या वैयक्तिक दुःखातून सावरण्यासोबतच पक्षावर आपली पकड मजबूत करू शकतील.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. विलिनीकरण होवो वा न होवो, त्याबाबतचे सर्व अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांनाच घ्यावे लागतील. हे निर्णय केवळ राजकीयच नव्हे, तर कौटुंबिक पातळीवरही अत्यंत संवेदनशील असतील.
या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत किंवा पक्षप्रमुखपदाबाबत थेट कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. उलट त्यांच्या शपथविधीबाबतही आपल्याला काही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या पक्षातील वरिष्ठ नेते शांत असल्याचं चित्र दिसत असलं, तरी भविष्यात परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जर सुनेत्रा पवार पक्ष एकसंध ठेवण्यात यशस्वी ठरल्या आणि शिवसेना व भाजपसोबत तोडीस तोड राजकीय भूमिका निभावू शकल्या, तर त्या राष्ट्रवादीच्या इतिहासातीलच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने पहिल्या प्रभावी महिला सर्वोच्च नेत्या ठरू शकतात.