राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार यांच्याकडून या अपघातावर 'घातपाताचा' संशय घेण्यात येत आहे. यादरम्यान त्यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेत खळबळ दावे केले आहेत. ज्यामुळे आता या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळाले असून या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. असं असताना त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत वर्तावली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच एक ट्वीट करून आमदार रोहित पवार यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकार कडे केली आहे .
हेही वाचा- Sunetra Pawar : शब्द जड झाले, कंठ दाटून आला; उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं शिवनेरीवर पहिलंच भाषण
सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
"आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे".