Vikram Kale: राज्यातील शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतर अशैक्षणिक कामे लावली जात असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'शासनाने चक्क भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचे काम शिक्षकांना दिले आहे,' असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत केला. यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
विक्रम काळेंचा सरकारवर हल्लाबोल
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार विक्रम काळे कमालीचे आक्रमक झाले होते. 'शिक्षकांना कुत्रे मोजायला लावणे हा शिक्षक पेशाचा अपमान आहे. असे विचित्र आदेश देणारे परिपत्रक कोणी काढले? संबंधित विभागावर शासन काय कारवाई करणार?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त शिक्षक दुसरे कोणतेही काम करणार नाहीत,' असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर! खात्यात 'या' महिन्याचे पैसे जमा झाले का? लगेचच चेक करा
'गणना नाही, फक्त देखरेख'; सरकारचे स्पष्टीकरण
आमदार काळेंचे आरोप शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तातडीने फेटाळून लावले. सरकारची बाजू मांडताना ते म्हणाले, 'शाळा परिसरात स्वच्छता राखणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार अनिवार्य आहे. शाळेच्या आवारात उघड्यावर अन्नपदार्थ पडलेले असतील, तर त्यांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत, जेणेकरून भटक्या प्राण्यांचा वावर कमी होईल. शिक्षकांना कुठेही कुत्र्यांची मोजणी करणे किंवा त्यांना पकडण्याचे आदेश दिलेले नाहीत,' असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.