Nandurbar Accident: नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात शनिवारी झालेल्या भीषण अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. हा अपघात पिकअप गाडी उलटल्याने घडला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पिकअप खोल दरीत कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार, ही पिकअप गाडी अस्तंबा यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना घेऊन परतत होती. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान चांदशैली घाटात वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि पिकअप खोल दरीत कोसळली. अपघात इतका गंभीर होता की, वाहनाचा पुढचा आणि मागचा भाग पूर्णपणे चिरडला गेला. मागील बाजूस बसलेले प्रवासी गाडीतच अडकले, तर काहीजण खाली फेकले गेले.
हेही वाचा - Shirdi Crime : शिर्डी साई संस्थान प्रशासनात मोठा घोटाळा उघड; 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - Shivsena : अनेक ठिकाणी महायुती स्वबळावर लढणार; शिंदेंच्या आमदाराचे वक्तव्य चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यात्रेच्या उत्साहातून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने गावात शोककळा पसरली आहे. चांदशैली घाटातील तीव्र वळणांमुळे आणि उंच उतारांमुळे या भागात अपघातांची मालिका सुरूच असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. तसेच चालकाचे नियंत्रण का सुटले याचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा घाटरस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.