रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील रोपवेची सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रोप-वेची वार्षिक तांत्रिक देखभाल व आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. हे काम 23 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणार असून या दरम्यान, रोप-वे सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. किल्ले रायगडावर वयोवृद्ध तसेच शाळकरी मुलांच्या सोयीसाठी हा रोप-वे खूपच उपयुक्त ठरतो. दरवर्षी सुरक्षितता व सेवा-सातत्य राखण्यासाठी रोप-वेची तांत्रिक तपासणी, देखभाल तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे केली जातात. त्याचाच भाग म्हणून ही वार्षिक देखभाल राबवली जाणार असल्याचे रोप-वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कालावधीत रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांनी रोप-वे सेवेचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच 1 मार्च 2026 पासून रोप-वे सेवा पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्यटकांनी नियोजन करताना या बंद कालावधीची नोंद घ्यावी, असेही रोप वे प्रशासनाने नमूद केले आहे. दरम्यान, 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने हजारोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करतात. मात्र त्यानंतर लगेचच रोप-वेची सेवा बंद केली जाणार आहे.
हेही वाचा : PM Narendra Modi Mumbai Visit Route : पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानिमित्त वाहतुकीत होणार मोठा बदल, दक्षिण मुंबईतील 'या' मार्गांवर 'नो एन्ट्री', जाणून घ्या सविस्तरपणे