Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले असून, जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवल्याचे नमूद केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाने स्वतःचा 2017 चा विक्रम मोडीत काढला आहे. 2017 मध्ये या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला 141 जागा होत्या, मात्र आता हा आकडा 236 च्या पार गेला आहे." भाजप 7 जिल्ह्यांत (छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा) पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे.
महायुतीची शंभराहून अधिक पंचायत समित्यांवर सत्ता
पंचायत समितीच्या निकालांबाबत माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 2017 मध्ये भाजपच्या 284 जागा होत्या, त्या आता 410 पर्यंत पोहोचल्या आहेत. एकूण 125 पंचायत समित्यांपैकी महायुतीने 100 हून अधिक समित्यांवर कब्जा मिळवला आहे. यात भाजप 50, शिवसेना 26 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 23 पंचायत समित्यांमध्ये सत्तेत असेल. रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेना, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर आणि लातूरमध्ये महायुतीने एकत्रितपणे वर्चस्व राखले आहे.
प्रशासनाच्या कामावर जनतेचा शिक्कामोर्तब
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विजयाचे श्रेय सरकारच्या कामाला दिले आहे. ते म्हणाले, "नगरपालिका आणि महानगरपालिकांनंतर आता जिल्हा परिषदांच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, ग्रामीण महाराष्ट्राची मानसिकता महायुतीच्या बाजूने आहे. सरकारने केलेल्या विकासकामांवर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे." विरोधकांकडे केवळ बोटावर मोजण्याइतपत जागा उरल्या असून, काँग्रेस आणि शरद पवार गटाला प्रत्येकी 7 ते 8, तर उद्धव ठाकरे गटाला केवळ 5 पंचायत समित्यांवर समाधान मानावे लागले आहे.
हेही वाचा - Sindhudurg ZP Election Results 2026: सत्ता महायुतीची, चर्चेत बंडखोर! सिंधुदुर्ग जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत अपक्षांचा अनपेक्षित प्रभाव; वाचा विजयी उमेदवारांची यादी
अजितदादांच्या आठवणीने मुख्यमंत्री भावूक
निवडणुकीच्या या यशाचा आनंद साजरा करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. "अजितदादांच्या जाण्याने आम्हाला सर्वांनाच मोठे दुःख झाले आहे. त्यांच्या निधनामुळेच मी स्वतः प्रचारात उतरलो नव्हतो, केवळ एक आवाहन करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता," असे ते भावूक होऊन म्हणाले. दादांच्या अनुपस्थितीत मिळालेला हा निकाल महायुतीसाठी संघर्षातून मिळालेले यश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.